सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे

 जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन 

रायगड : प्रतिनिधी :- एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीस 10 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या औचित्याने अधिनियमाच्या जनजागृतीसाठी 28 एप्रिल हा दिवस जिल्हा व ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सेवा हक्क दिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार, तहसिलदार शितल रसाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी निलेश लांडगे तसेच जिल्हाधिकारी शासकीय विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, राज्यातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक गतीमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरिता 28 एप्रिल 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,2015 अंमलात आला आहे. या अधिनियमांतर्गत 969 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी 536 सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. अधिनियमाचा प्रभावी वापर झाल्यास नागरिकांचे जीवन सुकर करण्यास मदत होईल. अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घरपोच सेवा देणारा सेवादूत उपक्रम, ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शासनाच्या सर्व विभागांच्या अधिसूचित सेवा उपलब्ध करुन देणे, सर्व शासकीय कार्यालयांत व आपले सरकार केंद्रांवर सेवा शुल्क व कालमर्यादा यांची माहिती देणारे व तक्रार नोंदविणेसाठी क्यू आर कोड उपलब्ध करुन देणे, आपले सरकार सेवा केंद्र सुरु करणे, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करणे आदी उपक्रम जिल्ह्यांमध्ये राबवावेत  अशा सूचना जिल्हाधकारी यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना देऊन सर्व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी सांगितले.



Comments

Popular posts from this blog